RPI CHIEF RAMDASH ATHWALE SAHEB मुंबई - रिपब्लिकन नेत्यांचे ऐक्य ही काळाची गरज असून त्यासाठी आपण एक पाऊल मागे घेण्यास तयार आहोत, असे सांगत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ऐक्याचे अध्यक्षपद देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. रमाबाई कॉलनीत आयोजित केलेल्या भीमसैनिकांच्या श्रद्धांजली सभेत आठवले बोलत होते. रिपब्लिकन नेत्यांमधील वेगवेगळ्या गटांमुळे चळवळ कमकुवत झाली आहे. त्यामुळेच राज्यात दलितांवरील हल्ले वाढत आहेत. रिपब्लिकन नेत्यांनी गटतट विसरुन पुन्हा एकदा एकीसाठी हात पुढे करावा, असे आवाहन आठवले यांनी केले. रिपब्लिकन ऐक्य होत असेल तर मी दुय्यम स्थान घेईन, असे सांगत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना ऐक्याचे अध्यक्षपद देण्याची तयारी दर्शवली. घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीत 1997 मध्ये पोलीस गोळीबारात बळी पडलेल्या 11 भीमसैनिकांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. मी शिवसेना-भाजपबरोबर गेलो असलो तरी मी आंबेडकरांचा पाईक आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव होईल. महायुतीत असलो तरी एक सामाजिक चळवळ म्हणून ‘रिपाइं’ चा स्वतंत्र अजेंडा कायम असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.
Posted on: Sat, 13 Jul 2013 15:00:33 +0000